Monday, September 5, 2022

भिकमचंद खंडेलवाल विद्यालय येथील मला घडवणारे शिक्षक व आठवणी


पाचवी मध्ये (१९९३-९४)  माझा दाखला आमच्या अकोल्यामधील भिकमचंद खंडेलवाल विद्यालय येथे करण्यात आला.

शाळा चांगली होती. आमच्यावेळी मराठी माध्यम आणि स्टेट बोर्ड जास्त चलन होती.

मी ईयत्ता पाचवा अ वर्गात होतो.

वर्ग शिक्षक कांबळे सर होते.

सर चांगले अन् कडक शिस्तीचे होते. इंग्रजी अन् गणित हे दोन विषय सर शिकवायचे. इथे पहिल्यांदाच माहीत पडलं की विषयानुसार पण शिक्षक असतात. सरांनी इंग्रजी अन् गणितात अतिशय मूलभूत सिद्धांत शिकवले. सरांची इंग्रजी शिकवण्यात सर्वात छान गोष्ट म्हणजे सर रोज इंग्रजीचे शुद्धलेखन लिहूनच घ्यायचे अन् विशेष म्हणजे ते रोज तपासायचे. रोज इंग्रजीचे 5 शब्द अन् त्यांचा अर्थ वहीत लिहायचा, पाठ करून घ्यायचे अन् ते पाठ आहे की नाही त्याची रोज शहानिशा करून घ्यायचे, नाहीतर बेंच वर उभे करायचे. 

सरांची अजून एक मस्त पद्धत म्हणजे वर्गातील निवडक हुशार मुलांना इतर मुलांची वही तपासायला लावायची अन् त्या मुलांची वही स्वतः तपासायची. अन् त्यांना हुशार मुलांची वहितील चुका बिलकुल खपायाच्या नाही.

सर शाळेनंतर tution घ्यायचे. पण त्यांचेकडेच tution लावण्याची कधीच जबरदस्ती नसायची. माझी मम्मी पप्पा घरीच tution घ्यायचे. त्यामुळे माझी त्यांचे कडे tution नव्हती पण माझी इंग्रजीतील प्रगती पाहून त्यांनी मला पण एक लाईन तपासणीसाठी दिली होती.

अन् एकदा मी गृहापाठची वही घरी विसरलो होतो पण सराना वाटलं की मी गृहपाठ केला नाही अन् खोटं बोलतोय म्हणून मस्त धुतलं पण होतो. त्यामुळं कधीच गृहपाठ न करता अन् वही न नेता कधीच शाळेत गेलो नाही.

मराठी आम्हाला माळी सर शिकवायचे अन् ते चित्रकला पण शिकवायचे. संगीताला सोबत क्षीरसागर सर होते. सरांनी एकदा मला गायनासाठी पण निवडलं होतं.

माझा आवाज फार चांगला नव्हता कदाचित म्हणून मी एकल गायनात कधी समोर आलो नाही पण तरीही मी जायचो म्हणून सरांनी मला समूह गायनात नेहमी घेतलं. पण ती मजा होती.

विज्ञानाचे शिक्षक पळसकर सर  होते. ते प्रश्नोत्तरे फळ्यावर लिहून द्यायचे अन् आम्हाला पटापट आमच्या वहीत लिहून घ्यायला लावायचे अन् वरून खाली आले की लगेच वरचे मिटायचे. एकदा असेच त्यांनी मला धुतलं होत. पण ते का ते अजूनही कळले नाही. अन् आमच्यावेळी मात्र तुम्ही का मारताय हे विचारायची सोय नव्हती. सर मात्र फ्री हिट मिळाल्यासारखे आम्हाला धुवायचे. घरी पण सांगता येत नव्हते नाही तर घरी पण बत्ती बसायची.

आमच्यावेळी धर्म अन् जातीयता तर समजतच नव्हती. भिमगिते अन् सरस्वती वंदना आम्ही एकामागे एकच म्हणायचो अन् दर शनिवारी माळी सर हनुमान स्तोत्र पठण करून घ्यायचे. Bed चे प्रात्यक्षिक साठी येणाऱ्या एका मुस्लिम सरांनी आम्हाला कलमा पण शिकवला होता.आता असे झाले तर काही कद्रू मनोवृत्तीचे लोक त्याचे काय भांडवल करतील सांगता येत नाही. 

मला सहावी की सातविची गोष्ट आठवते, गणिताच्या गृहपाठ विषयी होती. कांबळे सरांनी गृहपाठ दिला होता. एक गणित किचकट होते (आमच्या दृष्टीने) अन् ते मी दोन तीन पद्धतीने केले होते अन् ते चुकले होते. सरांनी वही माझ्या तोंडावर फेकून मारली. अन् नंतर इतरांच्या वह्या तपासल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ते गणित फक्त मीच सोडवलं होत.

मग लगेच सरांनी माझे कौतुक पण केले होते. अन् मला खूपच छान वाटलं होतं.

त्या दिवशी मनावर बिंबले चुकलं तरी चालत पण प्रयत्न केला पाहिजे.

सर आता आपल्यात नाही. पण माझ्या प्रत्येक सोडवलेल्या गणितात मला सरांची आठवण येते. माझ्या इंग्रजी भाषेच्या शब्द रचणे मागे माझी मम्मी अन् कांबळे सर यांच्या मेहनतीचा पायाभरणी आहे.

5 व्या वर्गात मधल्या सुट्टीत मी एकदा शाळेच्या वऱ्हांड्यात धावत असताना माझी एका मुलासोबत धडक झाली अन् माझा उजवा पाय मोडला मग मला माझ्या याच शिक्षकांनी मला उचलून ऑटो मध्ये टाकून  हॉस्पिटल मधे दाखल केले. अन् माझे फ्रॅक्चर चे प्लास्टर लागेपर्यंत ते हॉस्पिटल मध्ये सोबत होते.

कांबळे सर, माळी सर अन् अजून एका सरांनी आमची सातविची शिष्यवृत्ती ची tution शाळेतच घेतली होती. अतिशय नाममात्र शुल्क आकारले होते. अन् कांबळे सरांनी गणित, माळी सरांनी मराठी अन् त्या तिसऱ्या सरांनी बुद्धिमत्ता चाचणी चा अभ्यास आमचेकडून करून घेतला होता. अन् मी त्यावेळी शिष्यवृत्तीच्या परीक्षेत शाळेतून पहिला आलो होतो. माझे नाव शाळेच्या बोर्डवर सर्वात वर लिहिले होते. तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मला त्यावेळी ७५/- प्रतिमाह एवढी शिष्यवृत्ती पण देण्यात आली होती.

त्या तीनही सरांमुळे मला हे शक्य झालं. सोबत मम्मिपण घरी अभ्यास घेत होतीच.


सातवी मधून आठवीत गेलो तेव्हा दुपार पाळी सुरू झाली.

आम्ही सेमी इंग्रजी माध्यम स्वीकारले सोबत संस्कृत पण नवीन विषय सुरू झाला. यावेळी वर्ग शिक्षिका येळणे मॅडम होत्या. त्या सुद्धा इंग्रजी अन्  संस्कृत शिकवायच्या. संस्कृतची ओळख येळणे मॅडमने करून दिली. देव, वनं, माला हे शब्द चालवणे, धातू शब्द रुपावली सगळाच बेस मॅडमने पक्का करून घेतला. आज आयुर्वेदाचा डॉक्टर म्हणून संहिता वाचणे सोप जाते ते मॅडमने शब्द फोड करून अर्थ समजून घेणे शिकवल्या मुळेच. ज्या प्रेमाने अन् आत्मियतेने मॅडमने संस्कृत शिकवले ती आत्मीयता मला नंतर संस्कृत शिकताना कुठेच जाणवली नाही.

मॅडमनी इंग्रजी सुद्धा छान शिकवलं. Workbook मी आधी पासून वापरत असलो तरी. त्यातून अजुनच चांगला अभ्यास करून घेतला.

सेमी इंग्लिश मध्ये आल्यामुळं मला विज्ञान समजत होत पण सांगता येत नव्हते त्यावेळी जांभेकर सरांनी शिकवलेल magnetism chapter मला अजूनही आठवतो खरतर त्याच chapter चे भरवश्यावर मी सहामाही काठावर पास झालो होतो. तेव्हाच सायन्स 1 and science 2 ची ओळख झाली. अल्करी मॅडम सुद्धा छान शिकवायच्या त्यावेळी बायोगॅस निर्मितीचे उत्तर देताना मी cowdung and human dung हे शब्द वापरले त्यावेळी सर्व वर्ग हसला तरी त्यांनी प्रेमाने human dung नाही तर faceal matter हा शब्द आहे असे प्रेमाने सांगितले अन् माझा आत्मविश्वास कमी पडू दिला नाही.

मला त्यावेळी सहामाही परीक्षेत सायन्स मध्ये 40/100 मार्क पडले तेव्हा पप्पा ला सांगून येळणे मॅडमने सायन्स dictionary घ्यायला सांगितली अन् माझी वार्षिक परीक्षेत मार्क एकदम दुप्पट झाले. वैयक्तीक पातळीवर अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्या मॅडमचे मी आयुष्यभर ऋणी आहे.

त्यावेळी आम्हाला नुकतीच वाचनालयाची ओळख करून वाचायला पुस्तके देणे सुरू केले होते.

सुरुवातीला छोटे पुस्तके मिळायची पण मला एवढं पुस्तक वाचायला आवडत होते की मी एका दिवसात एक पुस्तक वाचून काढायचो.पुस्तक दर मंगळवारी बदलून मिळे पण मी त्या पुस्तकात एवढं घुटमळत होतो की लायब्ररी इन्चार्ज सर मला एक दिवसा आड पुस्तक बदलून द्यायचे. नंतर मला त्या गोष्टींच्या पुस्तकाचे एवढे वेड लागले की मी मधल्या सुट्टीत लायब्ररी मध्येच असायचो. त्यावेळी 24 भागांचे संपूर्ण परिकथा हा खंड मी 15 दिवसात संपवला. अन् फास्टर फेणे चे कित्येक पुस्तक वाचून काढले. हे वेड एवढे वाढले की मी ऑफ पिरियड मध्ये वर्गातून बाहेर पडून लायब्ररीत असायचो. तेव्हा bed चे प्रात्यक्षिक करणाऱ्या त्या temporary शिक्षक शिकवताना पण मी वर्ग सोडून वचानालयात असायचो मग शेवटी येलणे मॅडमनी पप्पा ल बोलावून माझी तक्रार केली अन् अभ्यासाचे पुस्तक वाचायला सांगितले. आजही वाचनाचा छंद मला आहे अन् आज 300 तरी पुस्तके माझे कडे आहेत. लायब्ररी इन्चार्ज सरांचे नाव लेंडे सर अन् ते माझे तेव्हाचे बेस्ट फ्रेंड झाले होते.सर मला तुमची आठवण येतेय.

आठवी नंतर मात्र माझी ही शाळा पप्पांच्या बदलीमुळे सुटली.

याच शाळेत असताना मला महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत मला consultation price रुपये 25 व सोबत प्रमाणपत्र मला पप्पाची बदली अमरावतीला झाल्याने पोस्टाद्वारे आले होते.

कदाचित या शाळेच्या बोर्डवर पुन्हा माझे नाव झळकले असेल पण त्यावेळी मी अमरावतीला न्यू हायस्कूल मेन मध्ये होतो.


Sunday, September 4, 2022

शिक्षक दिनानिमित्त प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या आठवणी

 आज शिक्षक दिवस.

या निमित्त सहज व आजन्म राहणारे काही शिक्षक ज्यांनी मला घडवलं.

जन्मापासून आपण काही ना काही शिकतच असतो. मात्र काही शिक्षक आयुष्याला वेगळच वळण देवून जातात

मटा पिता हे प्रथम शिक्षक पण मी आज शालेय व क्रमिक शिक्षकांबद्दल लिहिणार आहे.


बालवाडीत म्हणजे अपर्णा बालक मंदिर पन्नालाल बगीचा येथील शाळेच्या काळे बाई मला पहिल्यांदा आठवतात.

त्यांचा चेहरा आठवत नाही पण त्याच बालक मंदिरात मी प्रथम जायचो. अन् शाळेत पट्टीवर बसलेल आठवते.

मला नक्की माहीत नाही पण या बालक मंदिरात होय मंदिरच मी दोन वर्ष गेलो होतो अन् मला वाटायचं तस मी बालवाडीत नापास झाल्याने मला अजून एक वर्ष मी जायचो बालवाडीत ते विर वामनराव जोशी शाळेत.


वीर वामनराव जोशी शाळा ही गोरक्षण परिसर अमरावती येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या द्वारे चालवण्यात आलेली अन् त्याच परिसरात आहे.

त्याच शाळेत मी मालती बाई चे वर्गात होतो. त्यावेळी मला त्यांनी छान बडबड गीते शिकवली. ओरोगमी म्हणजे कागदापासून नाव, विमान बनणे आम्ही शिकलो. त्यांचा चेहरा थोडा आठवते.

अन् त्यांचे नाव विशेष यासाठीच की त्यांचे अन् माझे मोठया आईचे नाव एकच होते


त्या नंतर पहिल्या वर्गातील तांबे बाई आठवतात.

त्यांनी शिकवलेल्या कविता आठवतात.

अन् त्याच सोबत त्या वेळी मी शाळेतील पहिला डान्स त्यांनीच शिकविलेला कदाचित

रडू नको कृष्णा मी पाण्याला जाते

या गाण्यात मी केलेला कृष्णाचा रोल अन् त्यासाठी मला मिळालेलं गिफ्ट लाल पांढरा प्लॅस्टिकचा डबा पण आठवतो.



दुसऱ्या वर्गाच्या शिक्षिका होत्या पितळे बाई 

त्यांचा एक वाक्य मात्र अजूनही कानात फिरतो.

अभ्यासाच्या नावाने शंख मेल्याना.

अन् अजूनही मला त्याचे हसू येते. पण त्यातून आमच्या शिक्षिकेला आमचे अभ्यासाविषयी काळजी पण दिसून येते.


यात सर्वात महत्वाच्या म्हणजे कळमकर मामी. त्या माझ्यासाठी व माझ्या पालकांसाठी पण मामीच होत्या. त्यांचा शब्द अन् त्यांची आमच्यावर असणारी बारीक नजर होती.

मला तर त्या माझ्यासाठी त्या शाळेतील मुख्य व्यक्ती होत्या.

शाळेची मला प्रचंड आवड. मग मला ताप असला तरीही मी जायचोच. मग एकदा ताप असताना मला पाठवल म्हणून त्यांनी माझ्या मम्मीला खूप रागावल. मला त्यांचे घरात झोपवून ठेवलं.

त्या मात्र मला मुख्याध्यापक पेक्षा पण भारीच वाटायच्या.


त्या वर्षीच मला पप्पाने शुद्धलेखन विषयी एकदा मारलं होतं.

मला आठवत तो भ शब्द होता. अन् दुसरीतल्या मी पप्पाला म्हंटले होते तुमच्या पेक्षाही चांगलं अक्षर काढून दाखवील अन् त्या साठी मी अक्षर सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले.

माझ्या प्रत्येक चांगल्या अक्षारमागे तेच आहेत.

परंतु आजही पप्पाचे हस्ताक्षर माझ्या हस्ताक्षर पेक्षा खूप चांगले आहेत.



तिसरी मध्ये माझ्या वडिलांची बदली झाल्याने आम्ही अकोल्याला गेलो. तिथे आमचे शेजारचे मूल ज्या शाळेत जायचे त्याच नगर परिषद मराठी मुलांची शाळा क्रमांक 9 च्या उपशाखा असणाऱ्या काळा मारुतीच्या शाळेत माझा दाखला करण्यात आला.

तिथले अवचार गुरुजींच्या वर्गात मी होतो.

त्यावेळी त्यांनी माझे पाढे छान पाठ करून घेतले.

मला अजूनही आठवते माझा मित्र अलकरी व माझे 30 पर्यंत पाढे पथा होते.

आजही ते पाढे आठवणीत आहेत.

मुलांचे त्यामुळे (आताचे table) पाढे मी पाठ करून घेतो तेव्हा ते म्हणून दाखवतो. अन् सोबतच अवचार गुरुजींच्या आठवणी ताज्या होतात.

क्रमशः